कमला मिल आगीच्या निमित्ताने...

          गुरुवारी रात्री १२:३० च्या सुमारास मुंबईतील लोअर परळ येथील कमला मिल परिसरात असलेल्या 'वन अबाव्ह' व 'मोजोस बिस्ट्रो' या दोन हॉटेल्सला लागलेल्या आगीत १४ निष्पाप जीवांना मृत्यूला सामोरे जावे लागले. अनेक जखमी झालेत. आगीनंतर नेहमीप्रमाणे चौकशी, तपासणी, निलंबन, कारवाई व त्यावरील चर्चा हे नेहमीचेच सोपस्कार होत आहे.
          पूर्वी मुंबईत असलेल्या अनेक कापड गिरण्या बंद पडल्या. त्या कां व कशा बंद पडल्या हे इथे सांगण्याची गरज नाही. बंद पडलेल्या अनेक गिरण्यांच्या जागेवर बांधकाम व्यावसायिकांनी महापालिका तसेच राज्य प्रशासनाला हाताशी धरून टोलेजंग इमारती उभ्या गेल्या. आज या इमारती बघून इथे पूर्वी गिरण्या होत्या हे म्हणणं सुद्धा खोटं ठरू शकतं. या परिसरात फेरफटका मारल्यास लक्षात येईल की जागेत इमारती बांधण्यापासून ते इमारतीमधील चालणाऱ्या धंद्यापर्यंत सर्व काही "आलबेल" असल्याचे जाणवते. दोन इमारतीमधील अंतर हे एवढे कमी आहे कि एका इमारतीतील दुर्घटनेचा फटका शेजारच्या इमारतीला नक्कीच बसतो. नेमके हेच या दुर्घटनेत घडले. शहरातील कमी जागेत टोलेजंग इमारती उभारताना त्यात किती लोकांची ये - जा असते, त्यांच्यासाठी आपत्कालीन परिस्थितीत सुरक्षेच्या उपाय योजना कशा असतील, आगीसारखे प्रसंग उद्भवल्यास अग्निशमन यंत्रणेला घटनास्थळी पोचता यावे याकरिता मोकळी जागा किती सोडावी, याचे काहीतरी किमान नियम तर निश्चितच असतील. मात्र हे नियम कुठे व कुणासाठी आहेत हा सुद्धा संशोधनाचा विषय ठरू शकतो. मुंबईतील अनेक आगीच्या घटनांचा आढावा घेतला तर असे लक्षात येईल की मुंबईतील इमारती, घरे हे अत्यंत दाटीवाटीने बांधल्या गेल्या आहेत. त्याामुळे अग्निशमन दलाला घटनास्थळापर्यंत पोचण्यास विलंब होतो. दरम्यानच्या काळात जीवित व वित्त हानी मोठ्या प्रमाणात होते.
   
'मोजोस बिस्ट्रो' आगीनंतर 

'मोजोस बिस्ट्रो' आगीपूर्वी


         कमला मिल येथील आगीच्या घटनेची व तेथे झालेल्या लोकांच्या मृत्यूच्या कारणांची मीमांसा केली तर दोन्ही हॉटेल्सच्या रुफटॉपवर प्रवेश करण्यासाठी व बाहेर पडण्यासाठी असलेले मार्ग हे खूपच अरुंद होते. हॉटेल्स मध्ये चालणाऱ्या हुक्क्यासाठी लागणारे विस्तव व बार टेंडर्स कडून होणारे आगीचे खेळ यामुळे ही आग लागल्याची प्राथमिक माहिती आहे. त्यातही करामत म्हणजे तेथे परवानगी नसताना केलेले बांबू व प्लास्टिकचे केलेले आच्छादन हे आग भडकण्यास कारणीभूत ठरली. आग लागल्यावर सुरक्षितरित्या बाहेर पडता यावे यासाठी संकटकालीन मार्ग माहित नसल्याने व त्यातच  वीजपुरवठा खंडित झाल्याने लोकांची धावपळ उडाली. त्याठिकाणच्या रुफटॉपवर सर्वत्र बांबू व प्लास्टिक असल्याने सुरक्षित ठिकाण एकच होते ते म्हणजे स्वच्छतागृह. अनेक जण जीव वाचविण्यासाठी तेथे गेले, मात्र कार्बन मोनॉक्साईड या विषारी वायूने गुदमरून अनेकांचा जीव गेला.
आगीनंतर वन अबाव्ह हॉटेलवर महापालिकेची कारवाई

            कमला मिलच्या आगीपूर्वी अनेकांनी संबंधित ठिकाणी चालणाऱ्या गैरप्रकारांबाबत महापालिकेला कळवले होते, असे म्हटले आहे. महापालिकेने तर याठिकाणी काहीच अयोग्य किंवा चुकीचे घडत नसल्याचा दावा करत त्यांच्या तक्रारीला केराची टोपली दाखवली. तर दुसरीकडे एका सहाय्यक आयुक्तांनी सांगितल्यानुसार, एखाद्या ठिकाणी कारवाईची नोटीस पाठवली असता राजकीय दबाव किंवा न्यायालयातून कारवाईवर स्थगिती आणली जाते. म्हणजे मुंबईत घडलेल्या घटनेला केवळ हॉटेलचालक व महापालिकाच नाही तर राजकीय नेते सुद्धा जबाबदार असल्याचे दिसून येते.
      तेव्हा मुंबईतील अनेक हॉटेल्स, पब्स, हुक्का पार्लर येथे केलेले अनधिकृत बांधकामे तोडण्यास आता पालिकेने धडक कारवाई सुरु केली आहे. ही कारवाई किती काळ चालणार हा सद्यातरी प्रश्न असला तरी तो शेवटी फार्सच ठरतो. कारण यापूर्वी झालेल्या अनेक दुर्घटनांचा विशेषतः एल्फिन्स्टनचे उदाहरण आपल्याला माहितीच आहे. असो, यावेळी तरी ती बांधकामे अनधिकृत रित्या पुन्हा उभी राहू नये म्हणजे मिळवलं.

4 comments:

शांत आणि शिस्तप्रिय उद्धव ठाकरे...

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव आणि प्रबोधनकार ठाकरे यांचा नातू म्हणून उद्धव ठाकरे यांना मोठी वैचारिक परंपरा लाभली. घरातील चळव...