जागतिक अर्थव्यवस्थेतील महिलाराज


      भारतीय वंशाच्या गीता गोपीनाथ यांनी काल (८ जानेवारी) आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या मुख्य अर्थतज्ज्ञपदाची सूत्रे हाती घेतली. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीसोबतच जागतिक बॅंक आणि आर्थिक सहकार्य आणि विकास परिषदेसारख्या महत्त्वाच्या संस्थांची आर्थिक धुरा महिलांच्या हातात आहे. जागतिक बॅंकेच्या मुख्य अर्थतज्ज्ञपदी पिनेलोपी गोल्डबर्ग, तर आर्थिक सहकार्य आणि विकास परिषदेच्या मुख्य अर्थतज्ज्ञपदी लॉरेन्स बुन आपली जबाबदारी यशस्वीपणे सांभाळत आहे. सद्याच्या आर्थिक घडामोडींच्या पार्श्वभूमीवर जगाचे आर्थिक नेतृत्व महिलांच्या खांद्यावर देत खऱ्या अर्थाने नारीशक्तीचा गौरव केला आहे.

1. गीता गोपीनाथ 


       आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या प्रमुख ख्रिस्टिना लगार्ड यांनी आयएमएफच्या मुख्य अर्थतज्ज्ञ म्हणून गीता गोपीनाथ यांची नियुक्ती केली. मॉरिस ओब्स्टफिल्ड हे ३१ ऑक्टोबरला निवृत्त झाल्यानंतर या पदावर गोपीनाथ यांची नियुक्ती झाली. या पदावर निवड होणाऱ्या गोपीनाथ दुसऱ्या भारतीय असून यापूर्वी रघुराम राजन यांनी ही जबाबदारी पार पाडली आहे. सध्या गोपीनाथ या हार्वर्ड विद्यापीठात आंतरराष्ट्रीय घडामोडी आणि अर्थशास्त्राच्या प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत.
    8 डिसेंबर 1971 रोजी म्हैसूर येथे जन्मलेल्या गोपीनाथ यांनी दिल्ली विद्यापीठातून कला शाखेतील पदवी घेतल्यानंतर दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्‍स आणि वॉशिंग्टन विद्यापीठातून अर्थशास्त्रात पदव्युत्तर पदवी घेतली. 2001 मध्ये त्यांनी प्रिन्स्टन विद्यापीठातून अर्थशास्त्रात पीएच.डी. प्राप्त केली. पीएचडीनंतर गोपीनाथ या शिकागो विद्यापीठाच्या ग्रॅज्युएट स्कूल ऑफ इकॉनॉमिक्‍समध्ये सहायक प्राध्यापक म्हणून रुजू झाल्या. 2005 पासून हार्वर्ड विद्यापीठात विविध पदांवर त्या काम करत आहेत. दरम्यान, गोपीनाथ यांनी आतापर्यंत विविध ठिकाणी काम केले आहे. अमेरिकेतील राष्ट्रीय आर्थिक संशोधन केंद्राच्या सहसंचालक, फेडरल रिझर्व्ह बॅंक ऑफ न्यूयॉर्कच्या आर्थिक सल्लागार मंडळाच्या सदस्या, केरळच्या मुख्यमंत्र्यांच्या आर्थिक सल्लागार म्हणून मानद मुख्य सचिव दर्जा, फेडरल रिझर्व्ह बॅंक ऑफ बोस्टनच्या अतिथी संशोधक सल्लागार, जी-20 परिषदेसाठी भारताच्या अर्थमंत्रालयाच्या सल्लागार मंडळाच्या सदस्या, अमेरिकन इकॉनॉमिक्‍स रिव्ह्यूच्या सहसंपादक, रिव्ह्यू ऑफ इकॉनॉमिक स्टडीजच्या व्यवस्थापकीय संपादक म्हणून त्यांनी जबाबदारी पार पाडली आहे. त्यांनी चलन विनिमय दर, व्यापार आणि गुंतवणूक, मौद्रिक धोरण, कर्जे आणि उदयोन्मुख बाजारातील संकटे या विषयावर अनेक शोधनिबंध सादर केले आहेत.
     गोपीनाथ यांची आयएमएफच्या मुख्य अर्थतज्ज्ञ म्हणून नियुक्ती करताना ख्रिस्तिना लगार्ड म्हणाल्या की, गोपीनाथ या जगातील उत्कृष्ट अर्थशास्त्रज्ञांपैकी एक आहेत. उत्तम शैक्षणिक पात्रता, आंतरराष्ट्रीय स्तरावरील कामाचा अनुभव आणि नेतृत्व क्षमता या पदासाठी नक्कीच फायदेशीर ठरतील. गोपीनाथ यांच्या तांत्रिक कौशल्याचा फायदा भारताच्या भांडवली बाजाराच्या वाढीसाठी आणि ढोबळ आर्थिक धोरणांच्या विकासासाठी फायदेशीर ठरू शकतो, असे जाणकारांनी म्हटले आहे.

2. पिनेलोपी गोल्डबर्ग 

    26 एप्रिल 2018 ला जागतिक बॅंकेचे अध्यक्ष जिम योंग किम यांनी मुख्य अर्थतज्ज्ञ म्हणून येल विद्यापीठातील अर्थशास्त्राच्या प्राध्यापिका पिनेलोपी गोल्डबर्ग यांची नियुक्ती केली. 1963 मध्ये जन्मलेल्या गोल्डबर्ग या जर्मनीच्या फ्रेबर्ग विद्यापीठाच्या पदवीधर असून त्यांनी स्टॅनफोर्ड विद्यापीठातून पीएचडी मिळवली आहे. ग्रीक-अमेरिकन वंशाच्या गोल्डबर्ग यांचा ढोबळ अर्थशास्त्राच्या उपयोगितेवर खास अभ्यास असून विकसनशील देशांच्या व्यापारातील विषमता आणि उत्पादकता, नफा आणि नवसंकल्पना तसेच बौद्धिक संपदा अधिकारांचा उपयोग यावर त्यांचा विशेष भर आहे. गोल्डबर्ग यांनी अर्थशास्त्र विषयातील अनेक शोधनिबंध सादर केले असून त्यांना अनेक पुरस्कार व फेलोशिप मिळाल्या आहेत. त्या अमेरिकन इकॉनॉमिक असोसिएशनच्या उपाध्यक्षा असून इकॉनॉमेट्रिक सोसायटीच्या कार्यकारी समितीच्या सदस्या आहेत. गोल्डबर्ग यांनी 2011 ते 2017 दरम्यान अमेरिकन इकॉनॉमिक रिव्ह्यूच्या मुख्य संपादक म्हणून काम केले आहे. अमेरिकन ऍकॅडमी ऑफ आर्ट ऍण्ड सायन्सच्या सदस्या असून त्यांना प्रतिष्ठेची गॅजेहम मेमोरियल फाऊंडेशन आणि स्लोआन रिसर्च फेलोशिप, तसेच बोडोसाकी पुरस्कार मिळाला आहे. नॅशनल ब्युरो ऑफ इकॉनॉमिक्‍स रिसर्चच्या सहायक संशोधक आणि ब्युरो ऑफ रिसर्च इकॉनॉमिक ऍनालिसीस ऍण्ड डेव्हलपमेंटच्या सदस्या आहेत. यापूर्वी त्यांनी प्रिन्स्टन विद्यापीठ आणि कोलंबिया विद्यापीठात प्राध्यापक म्हणून काम केले आहे. गोल्डबर्ग यांची जागतिक बॅंकेच्या मुख्य आर्थिक सल्लागार म्हणून नियुक्ती करताना अध्यक्ष जिम योंग किम म्हणाले की, गोल्डबर्ग यांचा प्रगल्भ शैक्षणिक अनुभव, बौद्धिक चातुर्य आणि जिज्ञासूपणा जागतिक बॅंकेला निश्‍चितपणे नव्या उंचीवर नेईल. त्यांचा विकसनशील देशांच्या विकासातील अडचणींवर विशेष अभ्यास असून त्याचा उपयोग या ठिकाणी होईल. गोल्डबर्ग विकसनशील देशांच्या भविष्यातील अर्थव्यवस्थेविषयी प्रभावी काम करतील, अशी मला खात्री आहे.

3. लॉरेन्स बुन 

    आर्थिक सहकार्य आणि विकास परिषदेचे (ओईसीडी) महासचिव एंजेल गुरिया यांनी ओईसीडीच्या मुख्य अर्थतज्ज्ञपदी लॉरेन्स बुन यांची 5 जूनला नियुक्ती केली. जुलै महिन्यात त्यांनी कॅथरीन मॅन यांच्याकडून पदाची सूत्रे हाती घेतली. मूळ फ्रान्सच्या असलेल्या बुन यांनी अर्थशास्त्रात पदव्युत्तर पदवी मिळवली असून लंडन बिझीनेस स्कूलमधून पीएचडी प्राप्त केली आहे. मुख्य अर्थतज्ज्ञ म्हणून त्या परिषदेच्या आर्थिक विभागप्रमुख असतील. आंतरराष्ट्रीय मौद्रिक आणि आर्थिक समिती, जी-7 आणि जी-20 परिषदेत त्या ओईसीडीचे नेतृत्व करण्याची जबाबदारी त्यांच्यावर असेल. बुन यापूर्वी एएक्‍सए समूहाच्या मुख्य अर्थतज्ज्ञ आणि एएक्‍सए आयएम ग्लोबलच्या मल्टी असेट क्‍लायंट सोल्युशन आणि रिसर्च हेड म्हणून काम करत होत्या. त्यांनी फ्रान्सच्या सीईपीआयआय या आर्थिक संशोधन संस्थेत संशोधक म्हणून, तर 1998-2004 दरम्यान ओईसीडीच्या अर्थतज्ज्ञ म्हणून काम केले होते. त्या फ्रान्सच्या बार्कले कॅपिटलच्या मुख्य अर्थतज्ज्ञ, तसेच बॅंक ऑफ अमेरिकेतील युरोपियन आर्थिक संशोधन विभागाच्या व्यवस्थापकीय संचालकसुद्धा होत्या. 2014 ते 2016 दरम्यान, बुन या फ्रान्सच्या अध्यक्षांच्या बहुपक्षीय आणि युरोपियन आर्थिक व वित्तीय घडामोडी आणि जी-20 परिषदेसाठी विशेष मार्गदर्शक होत्या.

इंटरॅक्‍टिव्ह स्टोरीटेलिंगचा नवा अध्याय - "ब्लॅकमिरर : बॅंडरस्नॅच"

   अनेक दमदार कथानक असलेल्या वेबसिरीजमुळे प्रदर्शित करून नेटफ्लिक्‍स, ऍमेझॉन प्राईमने डिजिटल क्षेत्रात दबदबा निर्माण केला. कथानक, विषय मांडण्याचे स्वातंत्र्यामुळे डिजिटल माध्यम इतर माध्यमांपेक्षा अधिक प्रगल्भ होत आहे. त्यातच नेटफ्लिक्‍सने गेल्या शुक्रवारी (ता.28 डिसेंबर) बहुप्रतिक्षीत "ब्लॅक मिरर ः बॅंडरस्नॅच' ही वेबसीरीज प्रदर्शित केली. 2011 साली प्रदर्शित झालेल्या ब्लॅक मिरर या साय-फाय मालिकेचा पाचवा भाग नुकताच प्रदर्शित झाला. बॅंडरस्नॅच या पाचव्या भागात नेटफिलक्‍सने नव्या तंत्रज्ञानाचा वापर करत, प्रेक्षकांसाठी अनोखी पर्वणी दिली आहे. पूर्वीच्या व्हिडीओ गेम्समध्ये आपल्याला पर्याय देता येत असे, त्याचप्रकारे इंटरॅक्‍टीव्ह स्टोरीटेलिंगचा वापर या मालिकेत केला आहे. म्हणजेच कथानकानुसार आपल्यामसमोर आलेल्या दोन पर्यायांपैकी एक पर्याय निवडल्यावर त्यानुसार कथानक पुढे जाते. इंटरॅक्‍टिव्ह स्वरूपात सादर झालेल्या हा प्रयोग या क्षेत्रात कदाचित प्रथमच झाला आहे. ब्लॅकमिररच्या भागात बॅंडरस्नॅच या "तुमच्या आवडीचे कथानक तुम्हीच निवडा' प्रकाराच्या पुस्तकावर आधारित या भागातील नायक स्टिफन बटलर हा संगणक अभियंता त्याचप्रकारचा व्हिडीओगेम बनवतो. त्याचीच कथा यामध्ये दाखवली आहे.

नेमकं तंत्रज्ञान काय आहे? ः 

        प्रेक्षकांनी निवडलेल्या पर्यायानुसार कथानकाचा कालावधी हा 40 मिनिटांवरून दोन तासांहून अधिक वेळेपर्यंत वाढू शकतो. बॅंडरस्नॅच या भागाचे निर्मात्यांनी विविध प्रकारचे पाच शेवट तयार केले आहे. त्याचे परम्युटेशन कॉम्बिनेशन करून कितीतरी पर्याय तयार केले जाऊ शकतात. एखाद्या प्रेक्षकाने निवडलेल्या पर्यायानुसार त्याचे कथानक पुढे जाते. इंटरॅक्‍टिव्ह स्टोरीटेलिंग स्वरूपात कथानक सादर करण्यासाठी नेटफ्लिक्‍सने नेमकं कोणतं तंत्रज्ञान वापरले आहे, हे अद्यापही त्यांनी जाहीर केले नाही. मात्र, पर्याय प्रेक्षकांसाठी पर्याय देणे आणि प्रेक्षकांनी ते पर्याय निवडणे, आणि त्यानुसार कथानक पुढे नेणे यासाठी अल्गोरिदम आणि फ्लोचार्टचा वापर केला आहे. त्या काही तंत्रविषयक संकेतस्थळांवर दिलेल्या माहितीनुसार कृत्रिम बुद्धिमत्ता आणि परम्युटेशन-कॉम्बिनेशन थेअरीचा वापर यामध्ये केला आहे. 

इंटरॅक्‍टिव्ह स्टोरीटेलिंगचा इतिहास ः
      ब्लॅक मिरर ः बॅंडरस्नॅच ही पहिलीच इंटरॅक्‍टिव्ह स्टोरीटेलिंग वेबसिरीज असली तरीही हा प्रकार काही नवा नाही. इंटरॅक्‍टिव्ह स्टोरीटेलिंगला अनेक वर्षांचा इतिहास आहे. पाश्‍चात्य देशात खुल्या रंगमंचावर किंवा मैदानात सादर होणाऱ्या कलाविष्कारावेळी सादरीकरणा दरम्यान प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया आणि प्रतिसादानुसार सादरीकरणात बदल केले जात होते. त्याचप्रमाणे 1960 च्या दशकात आलेल्या "दि ऍडव्हेन्चर ऑफ यु ऑन शुगरकेन आयलॅंड' या पुस्तकाच्या मालिकेत देखील इंटरॅक्‍टिव्ह स्टोरीटेलिंग पद्धतीचा वापर केला गेला. त्यातील कथानकानुसार दोन पर्यायांची निवड दोन वेगवेगळ्या परिच्छेदातून निवडता येते. अमुक एका पर्यायासाठी - "परिच्छेद अ' आणि तमुक एका पर्यायासाठी - "परिच्छेद ब' दिला जातो. 1967 साली प्रदर्शित झालेल्या "किनॉटॉमॅट' या चित्रपटात देखील इंटरॅक्‍टिव्ह स्टोरीटेलिंगचा प्रकार हाताळला गेला. एका 127 आसनी चित्रपटगृहातील प्रत्येक आसनाला दोन बटन दिले होते. कोणतेही एक बटन दाबून चित्रपटातील कथानकानुसार प्रेक्षकांना दोन पर्यायांपैकी एकाची निवड करता येते. 90च्या दशकातील व्हिडीओ गेमिंगमध्ये इंटरॅक्‍टिव्ह प्रकार खूप लोकप्रिय होता, हे आपण सगळेच जाणतोच.


      भविष्यात गेझ डिटेक्‍शन, गेस्चर कंट्रोल, व्हॉईस कंट्रोल, व्हर्च्युअल रिऍलिटी या तंत्राचा वापर करून इंटरॅक्‍टिव्ह स्टोरीटेलिंगचा प्रकार अधिक प्रगल्भ होईल. म्हणजेच प्रेक्षकांना कथानकात त्याच्या आवडीनुसार अधिक निवडस्वातंत्र्य मिळण्याची शक्‍यता आहे. सद्या दिले जाणाऱ्या दोन पर्यायांऐवजी अनेक पर्याय उपलब्ध होतील. त्याचप्रकारे सद्या केवळ वेबसिरीज पुरता मर्यादित असलेला हा प्रकार पुढे चालून दुरदर्शनवर रोज येणाऱ्या मालिकेमध्ये आला, तर आश्‍चर्य वाटायला नको. या नवतंत्रज्ञानामुळे या माध्यमात पुढे आणखी वेगवेगळे हाताळले जातील. नेटफ्लिक्‍सने केलेला हा प्रयोग म्हणजे डिजिटल माध्यमात आपले स्थान अधिक घट्ट करण्याचा देखील डाव असल्याचे बोलले जाते.

------
ऋषिराज तायडे,
rushirajtayde@gmail.com

श्री संताजी जगनाडे महाराज

महाराष्ट्राला मोठी संत परंपरा लाभली आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी चालविलेल्या परंपरेला अनेक संतांनी पुढे नेले. समाजाच्या प्रबोधनासाठी जगदगुरु तुकाराम महाराज यांनी चालवलेल्या कार्यात मोलाचा वाटा उचलला तो, संताजी जगनाडे महाराज यांनी. संताजी महाराजांनी केलेल्या कार्यामुळे आज तुकोबारायांचे अभंग आपल्यापर्यंत पोहचलेत. इंद्रायणीत बुडवलेल्या गाथा पुन्हा आपल्यापर्यंत पोचल्या. तुकाराम महाराज आणि संताजी महाराज यांची कर्मगाथा, जीवनगाथा एकमेकांशिवाय अपूर्ण ठरते. संताजी महाराजांचे तुकोबारायांच्या विचारांशी असलेलं तादात्म्य हे कमालीचे एकरूप आहे.

संताजी जगनाडे महाराज यांचा जन्म ६ डिसेंबर १६२६ रोजी चाकण जवळील सदुंबरे येथे झाला. लहानपणापासून संताजींना अध्यात्म आणि देवदर्शनाची आवड होती. संताजी महाराजांचे आजोबा भिवाशेठ जगनाडे यांचा तेलाचा घाणा होता. तेलाचा हा व्यवसाय त्यांचा मुलगा विठोबाशेठ यांच्याकडे आला. विठोबाशेठ यांचं लग्न सुदुंबरे येथील काळे परिवारातील मथुबाईंसोबत झालं. काही ठिकाणी त्यांच्या नावाचा मथाबाई असाही उल्लेख येतो. विठोबा आणि मथाबाईंच्या पोटी संताजी महाराजांचा जन्म झाला. संताजींना अक्षरओळख, गणित असं बऱ्यापैकी शिक्षण मिळालं. संताजी अत्यंत तल्लख बुद्धिमत्तेचे होते. त्यांची निरीक्षणं अत्यंत सूक्ष्म असायची. वयाच्या दहाव्या वर्षी वडलोपार्जित तेलाच्या व्यवसायात संताजींचा प्रवेश झाला. अकराव्या वर्षी संताजींच्या विवाहासाठी स्थळ सांगून आलं. त्याकाळात लग्न बालवयातच व्हायची. खेड येथील कहाणे परिवारातील यमुनाबाईंसोबत त्यांचं लग्न झालं. पुढे चालून त्यांना बाळोजी व भागू ही मुलं झालीत. 

संताजी महाराजांच्या बालपणीची एक आख्यायिका सांगितली जाते. ते रोज आपल्या आईसोबत गावातील चक्रेश्वर मंदिरात जात. गावातील या मंदिरात आई पूजा करायची आणि देवाला नैवेद्य अर्पण करायची. चक्रेश्वराच्या मंदिरात अनेकजण आश्रयाला राहत. एके दिवशी एक भुकेने व्याकूळ झालेला मनुष्य त्यांना दिसला. संताजींनी नैवेद्याचं ताट त्या भुकेल्या माणसाला दिलं. तो तृप्त झाला. मात्र नैवेद्यासाठी आणलेलं ताट संताजींनी कुणालातरी दिल्याने आई रागावली. त्यावर संताजी महाराज म्हणाले मी, ज्याला अन्नाची जास्त गरज आहे त्याला पहिल्यांदा ते दिलं पाहिजे. लहानपणीच त्यांना माणसातील ईश्वर दिसला. 

   संताजी महाराजांचे आणि तुकोबांच देहू जवळच होते.  जगद्गुरू तुकोबारायांच्या कार्याची मोठी व्याप्ती होती. प्रत्यक्ष भेटून किंवा ऐकून तरी सर्वांना तुकाराम महाराज माहीत होतेच. त्यातूनच १९४० मध्ये संताजी आणि तुकोबांची भेट झाली. तुकोबांंच्या कार्याचा प्रभाव संताजींवर झाला. तुकोबा सादर करत असलेले अभंग संताजी लिहून काढत. काही ठिकाणी असाही उल्लेख आढळतो की ते तुकोबांचे लेखनिक होते. मात्र, याबाबत एकमत नाही. तुकोबांना संताजी गुरुस्थानी मानत.तुकोबांसोबत ते अभंग लिहू लागले. 

संताजी महाराज आपला प्रपंच, व्यवसाय आणि समाज यात उत्तम संतुलन साधत. संत तुकाराम महाराजांनी अध्यात्म आणि विज्ञान लोकांना समजावून सांगितलं. त्यामुळे वैदिक कर्मकांड करणाऱ्यांचा विरोध व छळ त्यांना भोगावा लागला. संताजी महाराज हे त्यांच्या पक्षातले, म्हणून हा दाह त्यांच्याही वाट्याला आलाच. पण संताजी महाराज डगमगले नाहीत. त्यांनी आपल्या लेखनाचं व प्रबोधनाचं कार्य सुरूच ठेवलं. अभंगांसह त्यांनी ‘शंकर दीपिका’, ‘योगाची वाट’, ‘निर्गुणाचं लावण्य’ आणि ‘तेल सिंधू’ या ग्रंथांचं लेखन केल्याचा उल्लेख काही ठिकाणी आढळतो. त्यांची काव्यप्रतिभा विलक्षणच होती. तेलाच्या व्यवसायातील अनेक रूपकं, उपमा, अलंकार व चित्रण त्यांच्या अभंगांतून झळकतं. त्यांच्या सहजलेखनात किती मोठ्ठं जगण्याचं तत्त्वज्ञान होतं, हे पुढील अभंगांवरून लक्षात येईल- 

मजशी ते ब्रह्मज्ञान काही नाही। आपुल्या कृपेने होईल सर्वथाही।। १ ।। 
होईल मज आणि माझिया कुळांशी। पांडुरंग मुळाशी सर्व आहे।। २।। 
संतु म्हणे ब्रह्म ब्रह्मा सर्व जाणे। आपुले ते मन सुधारले।। ३ ।। 

आमुचा तो घाणा त्रिगुण तिळाचा। नंदी जोडियला मन पवनाचा।।१।। 
भक्ति हो भावाची लाट टाकियली। शांती शिळा ठेवीली विवेकावरी।।२।। 
सुबुद्धीची वढ लावोनी विवेकांस। प्रपंच जोखड खांदी घेतीयले।।३।। 
फेरे फिरो दिले जन्मवरी। तेल काढियले चैतन्य ते।।४।। 
संतु म्हणे मी हे तेल काढियले। म्हणुनी नांव दिल संतु तेली।।५।। 


मार्गशीर्ष वद्य त्रयोदशी म्हणजेच ३ जानेवारी १६८८ ला संताजी महाराजांनी देह ठेवला. तुकोबांची संतपरंपरा पुढे चालवण्याबरोबर समाजाच्या उद्धारासाठी केलेला अट्टाहास ही संताजी महाराजांची ओळख. त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून ९ फेब्रवारी २००९ रोजी तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या काळात त्यांच्यावरील एक पोस्टाचं तिकीटही निघालं. यात त्यांचा कार्यकाळ १६२४ ते १६८८ असा सांगितला आहे. शासकीय मतानुसार संताजी महाराज हे संत तुकाराम महाराजांचे समकालीन ठरतात. काही मतप्रवाहानुसार त्यांचा कार्यकाळ १६५० ते १६०८ असाही सांगितला जातो.  त्यांच्या प्रेमाची, विश्वासाची, श्रद्धेची आणि आपुलकीची. एका ज्ञानसाधकाच्या, प्रबोधनकाराच्या, तत्त्ववेत्त्याच्या ऐहिक आयुष्याला जरी मर्यादा असली तरी, त्यांच कार्य अमर्याद, असीम, अभंग आणि अखंडच असतं. वारकरीधर्मातील संत जगनाडे महाराज यांच्या स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन. 

शांत आणि शिस्तप्रिय उद्धव ठाकरे...

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव आणि प्रबोधनकार ठाकरे यांचा नातू म्हणून उद्धव ठाकरे यांना मोठी वैचारिक परंपरा लाभली. घरातील चळव...